पोकळ धमक्यांपुढे न झुकणारा पत्रकारितेचा संघर्षमय प्रवास – अमजद सय्यद, संपादक ‘लोकविचार’
पत्रकारिता ही माझ्यासाठी केवळ उपजीविकेचे साधन नाही; ती समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची ती एक अखंड लढाई आहे. या लढाईत गेली अनेक वर्षे मी सातत्याने उभा आहे आणि पुढेही राहणार आहे.
सन २००८-०९ च्या सुमारास पत्रकारितेच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. सुरुवातीपासूनच क्राईम पत्रकारिता हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय राहिला. या प्रवासात अनेक चांगले-वाईट अनुभव आले, संकटे आली, अडथळे आले; पण सत्याची बाजू मांडण्याची आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची भूमिका कधी बदलली नाही.
पत्रकारितेची पहिली संधी देणारे माझे मार्गदर्शक रवींद्र पाटील सर आणि पत्रकारितेचे धडे देणारे माझे गुरु, इन न्यूजचे संपादक लक्ष्मीकांत (मामा) शिंदे यांच्याप्रती मी कायम ऋणी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच संघर्षाचा हा प्रवास सुरू झाला आणि धाराशिव जिल्ह्यातील सहकारी केबल ऑपरेटरांच्या पाठिंब्याने त्याला बळ मिळाले.
अवैध धंदे, भ्रष्टाचार, दलाली, गुन्हेगारी आणि सामान्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात मी सातत्याने लिहित राहिलो. या लिखाणामुळे अनेकदा धमक्या मिळाल्या. खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे प्रयत्न झाले. मारहाणीच्या, जीवे मारण्याच्या, गाडीखाली चिरडण्याच्या धमक्या देण्यात आल्या. काहींनी दबाव टाकला, काहींनी आमिष दाखवले, तर काहींनी बदनामीचे कारस्थान रचले. पण या सर्वांपेक्षा सत्याची ताकद मोठी असल्याचा माझा विश्वास कधी डळमळला नाही.
काही वेळा गुंडांच्या घोळक्यात उभे करून मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विश्वासातील लोकांमार्फत बोलावून घेऊन संवादाच्या नावाखाली दमदाटी करण्यात आली. मात्र या प्रत्येक प्रसंगातून मी अधिक मजबूत होत गेलो. कारण मला ठाऊक होते की, भीतीपोटी लेखणी थांबवली तर समाजातील अनेक अन्याय अंधारातच राहतील.
होय, काही वेळा दोन पावले मागे घ्यावी लागली. कारण प्रत्येक संघर्षाच्या क्षणी डोळ्यासमोर वयोवृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुलांचे चेहरे उभे राहत होते. कुटुंबाची काळजी मनाला स्पर्शून जायची. पण त्या काही क्षणांच्या शांततेनंतर पुन्हा त्याच जोमाने, त्याच आक्रमकतेने लेखणी हातात घेतली. कारण सत्याचा मार्ग कठीण असला तरी तो सोडण्याचा विचार कधी मनात आला नाही.
धाराशिवसारख्या संवेदनशील भागात पत्रकारिता करताना दबाव, धमक्या आणि अडचणींची कमतरता कधीच नव्हती. मात्र या प्रवासात आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबाची भक्कम साथ आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन हेच माझे खरे बळ ठरले. कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक पाठबळाशिवाय स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आजही त्याच तत्त्वांवर ठाम आहे.
अनेकदा अपमान, शिवीगाळ, मानसिक त्रास आणि बदनामीचा सामना करावा लागला. पण प्रत्येक अपमानाला मी माझ्या प्रगतीची पायरी समजले. प्रत्येक संकटाने मला अधिक खंबीर बनवले. प्रत्येक विरोधाने माझा निर्धार अधिक मजबूत केला.
अवैध धंद्यांविरोधात लिहिताना माझ्या डोळ्यासमोर नेहमीच सामान्य कुटुंबातील महिलांचे अश्रू, व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारे संसार, अन्याय सहन करणारे शेतकरी आणि समाजावर होणारे दुष्परिणाम असतात. या विषयांवर अभ्यासपूर्वक आणि जबाबदारीने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकरणांमध्ये यश मिळाले, अनेकांना न्याय मिळाला आणि हाच माझ्या पत्रकारितेचा सर्वात मोठा पुरस्कार ठरला.
या संपूर्ण प्रवासाने मला एक गोष्ट शिकवली,पोकळ धमक्यांना घाबरून जर पत्रकारिता करायची असेल, तर पत्रकारिता सोडून दिलेली बरी.म्हणूनच कोणत्याही दबावाला बळी न पडता, कोणत्याही खोट्या आश्वासनाला न भुलता आणि कोणत्याही भीतीसमोर न झुकता सत्यासाठी माझी लेखणी आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे.कारण माझ्यासाठी पत्रकारिता म्हणजे फक्त बातमी नाही,ती समाजातील अन्यायाविरोधात उभे राहण्याची जबाबदारी आहे,ती सत्यासाठी लढण्याची प्रतिज्ञा आहे.आणि ती सर्वसामान्यांच्या न्यायासाठी चाललेली अखंड चळवळ आहे.
– अमजद सय्यद
संपादक, लोकविचार 83900 88786


