“जनतेच्या दारी लोकप्रतिनिधी नगरसेवक आकाश तावडे यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”
धाराशिव लोकविचार
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये भानू नगर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक १८ येथे नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आकाश मधुकर तावडे आणि अलका प्रकाश पारवे यांच्या संयुक्त पुढाकाराने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या परिसरात जाऊन जाणून घेण्याच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटारी, वीज व इतर नागरी सुविधांबाबतच्या विविध समस्या मांडल्या.
यावेळी नगरसेवक आकाश तावडे यांनी सांगितले की, नागरिकांना छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी नगरपरिषद कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासू नये, यासाठी प्रत्येक महिन्यात प्रभागातील विविध ठिकाणी जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारी जागेवरच नोंदवून नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधत त्या तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल यामुळे प्रभागातील नागरिकांचा वेळ आणि त्रास देखील कमी होणार आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते मल्हार पाटील यांच्या आदेशानुसार प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल काकडे यांच्या सहकार्याने प्रभागातील विकासकामांना गती देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी सांगितले की, नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारात जाऊन ऐकणे आणि त्यांचे तातडीने निराकरण करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्यामुळे धाराशिव शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित जनता दरबार घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण केले जाईल. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास आणि कायापालट करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत आपल्या समस्या मांडल्या. या उपक्रमामुळे नागरिकांना थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने त्यांनी नगरसेवक आकाश तावडे व नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांचे आभार मानले.
या जनता दरबाराला नगरसेविका अलका प्रकाश पारवे, नगरसेविका राजकन्या अडसूळ, प्रकाश पारवे, पंकज जाधव, ओंकार बांगर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


