धाराशिव बसस्थानकातील एनसीएमसी कार्ड केंद्रावर मनमानी? ज्येष्ठ नागरिकांना धमक्या चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यास खंडणी मागितल्याची धमकी?
धाराशिव | लोकविचार
धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एनसीएमसी कार्ड काढण्याच्या कामासाठी कार्यरत असलेल्या एका एजंटविरोधात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आणि प्रवाशांकडून गंभीर तक्रारी समोर येत आहेत. कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांशी उद्धटपणे वागणे, अतिरिक्त रकमेची मागणी करणे, कार्ड ब्लॉक करण्याच्या धमक्या देणे आणि दबाव टाकणे असे आरोप संबंधित एजंटवर करण्यात आले आहेत.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, कार्ड काढण्यासाठी आलेल्या एका वयोवृद्ध दिव्यांग नागरिकाला संबंधित एजंटने अवमानकारक भाषेत बोलत “पैसे भर, अन्यथा कार्ड बंद करतो”, “एका ओटीपीवर तुझे कार्ड ब्लॉक करू शकतो” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलाला घटनास्थळी बोलावून घेतले.
यानंतर संबंधित एजंटला नागरिकांशी सभ्यतेने वागण्याबाबत जाब विचारण्यात आला. मात्र त्यानंतर कळंब येथून एका मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन आल्याचा आणि फोनवरून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. “तुला माझा इतिहास माहिती आहे का?”, “आमची कंपनी कोणाची आहे माहिती आहे का?” अशा शब्दांत धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सदर एजंटविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्या आहेत. माहिती विचारण्यासाठी किंवा शुल्काबाबत चौकशी करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर उलट दबाव टाकणे, खंडणी मागितल्याचे खोटे आरोप करण्याची धमकी देणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्ती या केंद्रावर मोठ्या प्रमाणात येत असतात. अनेक जण आजारी, अडचणीत किंवा तांत्रिक प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने एजंटकडून योग्य मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. मात्र त्यांच्याशी उद्धट वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारींमुळे संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित एजंटकडून निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचाही आरोप काही नागरिकांनी केला आहे. या आरोपांची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांनी एसटी महामंडळ प्रशासन, बसस्थानक व्यवस्थापन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, तसेच नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अन्यथा अशा प्रकारांना वेळीच आळा घातला गेला नाही तर संबंधित व्यक्तीचे मनोबल वाढून भविष्यात आणखी गंभीर प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळ प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, का पुन्हा याला पाठीशी घालते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

