तोतया पोलिसाला अभय कुणाचे? शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा का नाही; होमगार्ड प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
धाराशिव | लोकविचार
आनंदनगर पोलीस ठाण्यात विनयभंग प्रकरणात आरोपी असलेल्या कथित तोतया पोलिसाने थेट जिल्हा होमगार्ड कार्यालयात घुसून महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी आणि दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संबंधित व्यक्तीवर महिला होमगार्ड यांच्या तक्रारीनुसार केवळ काही कलमांखाली कारवाई करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण प्रकार हा शासकीय कार्यालयात सुरू असलेल्या अधिकृत कामकाजादरम्यान घडला. मोहरम बंदोबस्तासाठी ड्युटी वाटप सुरू असताना संबंधित व्यक्ती कार्यालयात दाखल झाली. महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे, अधिकाऱ्यांसमोर आदेश देणे, अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून स्वतःला अधिकारी असल्याचा आव आणणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे अशा घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे.
कायद्याच्या दृष्टीने पाहता, एखादी बाहेरील व्यक्ती शासकीय कार्यालयात घुसून सुरू असलेल्या प्रशासकीय कामात हस्तक्षेप करत असेल, कर्मचारी व अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असेल आणि कामकाजात अडथळा निर्माण करत असेल, तर त्याच्यावर “शासकीय कामात अडथळा” निर्माण केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल होणे अपेक्षित मानले जाते. मात्र या प्रकरणात अद्याप अशा स्वरूपाची कारवाई झालेली दिसून येत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू होता कारभार?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित तोतया पोलिस हा जिल्हा होमगार्ड कार्यालयात वारंवार येत असल्याचे आणि काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मागील अनेक महिन्यांपासून ड्युटी वाटप प्रक्रियेवर प्रभाव टाकत असल्याचे आरोप आहेत. जर हे आरोप खरे असतील, तर संबंधित व्यक्तीला इतके धाडस मिळालेच कसे? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.
महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करणारी व्यक्ती अधिकाऱ्यांच्या समोरच आदेश देत असेल, तर त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला रोखले का नाही? त्याच्याविरोधात तत्काळ पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही? शासकीय कार्यालयाची शिस्त मोडणाऱ्या व्यक्तीला अभय मिळत होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेनंतर होमगार्ड कार्यालयातील काही अधिकारी आणि संबंधित तोतया पोलिस यांच्यातील कथित संगनमताच्या चर्चांनाही उधाण आले आहे. कारण सामान्य नागरिकाला शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर अशा पद्धतीने वागणे शक्य नसताना, संबंधित व्यक्ती मात्र राजरोसपणे वावरत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
यामुळे हा प्रकार केवळ एका व्यक्तीच्या दहशतीचा आहे की त्यामागे काही प्रभावशाली संरक्षण आहे, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष घालणार का?
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका का घेण्यात आली नाही? जर संबंधित व्यक्तीला कुणीही पाठीशी घालत नसेल, तर जिल्हा होमगार्ड कार्यालयाने स्वतःहून तक्रार दाखल करून कारवाईची मागणी का केली नाही?
यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात हस्तक्षेप करून शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि शासकीय कार्यालयातील अनधिकृत हस्तक्षेप यासंदर्भातील सर्व बाबींची चौकशी करण्याचे आदेश देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, व्हिडिओ पुरावे, कर्मचाऱ्यांचे आरोप आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या तक्रारी लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकविचार | सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद 8390088786


