पत्रकारांना दूर ठेवत विशेष पोलीस महानिरीक्षकांचा धाराशिव दौरा दरवेळी संवाद टाळत असल्याने तीव्र नाराजी
धाराशिव | सर्वसामान्य छत्रपती
संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी दि. १६ एप्रिल २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करून पोलीस अधीक्षक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्यावर भर देत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.शरीराविरुद्धचे गुन्हे, दरोडे, घरफोडी, वाहनचोरी आणि मोबाईल चोरी यांसारख्या गुन्ह्यांचा जलद तपास करून ते उघडकीस आणावेत, असे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यांना नियमित भेटी देऊन प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घ्यावा आणि तपास अधिक गतिमान करावा, असेही सांगण्यात आले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.या बैठकीस पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.मात्र, प्रत्येक दौऱ्यादरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पत्रकारांशी संवाद साधण्याचे टाळल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पूर्वी वरिष्ठ अधिकारी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांशी थेट संवाद साधून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत असत. पत्रकारांकडून मिळणारी माहिती आणि सूचना या प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण ठरत होत्या.सध्या मात्र काही अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक पत्रकार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात दरी निर्माण केली जात असल्याची चर्चा असून, त्यामुळे संवाद पूर्णपणे खंडित झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक संवेदनशील मुद्दे वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचत नसल्याची खंत पत्रकारांकडून व्यक्त केली जात आहे.विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या या दौऱ्यातही पत्रकारांना दूर ठेवण्यात आल्याने नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला असून, आगामी काळात तरी पत्रकारांशी संवाद साधून पारदर्शकता राखावी, अशी मागणी पत्रकारांकडून केली जात आहे.
सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


