नगर परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापतींचे ‘कान टोचणार’ कोण? दालनांना कुलूप, जनतेला प्रतीक्षा.!
धाराशिव | सर्वसामान्य लोकविचार
धाराशिव नगर परिषदेमध्ये बहुमताने भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करत शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने कौल दिला. मात्र सत्तास्थापनेनंतर आता नगर परिषदेत वेगळेच चित्र पाहायला मिळत असून, विषय समित्यांच्या सभापतींसह अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या दालनांना कुलूप लागलेले दिसत आहे. परिणामी, आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना निराश होऊन परत फिरावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.निवडणुकीच्या काळात उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार प्रयत्न केले. “आम्ही जनतेसाठी २४ तास उपलब्ध आहोत”, “जनतेची कामे तातडीने सोडवू” अशा आश्वासनांचा पाऊस पडला. त्यानंतर नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापती पदांसाठीही मोठी चुरस पाहायला मिळाली. अखेर काही जणांना पदे मिळाली, तर काहींना नाराजी पत्करावी लागली.मात्र पद मिळाल्यानंतर खरी जबाबदारी पार पाडण्याऐवजी, काही सभापतींमध्ये केवळ केबिन आणि नावफलकावरच लक्ष केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे. “मला ही केबिन नको, दुसरी पाहिजे”, “दुरुस्ती करा”, “मोठा नेमप्लेट लावा” अशा मागण्यांमध्येच वेळ खर्च झाला. जनतेची कामे करण्यासाठी दिलेल्या दालनांचा उपयोग प्रत्यक्षात कितपत होतोय, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे, सर्वसामान्य लोक विचार च्या पाहणीत अनेक विषय समित्यांच्या सभापतींची दालने बंद अवस्थेत आढळून आली. संबंधित सभापती महिन्यातून दोन-तीन वेळाच दालनात येतात. उर्वरित वेळ दालने कुलूपबंदच राहतात. कर्मचारी मात्र दिवसभर अधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत बसून राहतात.या परिस्थितीमुळे विविध समस्या घेऊन नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, बांधकाम, महिला व बालविकास, शिक्षण,करसंबंधित प्रश्नांसाठी येणाऱ्या नागरिकांना काही अडचणी संबंधित सभापती भेटत नसल्याने त्यांना हेलपाटे मारून परत जावे लागत आहे. “आपला नगरसेवक, आपले सभापती आपले प्रश्न सोडवतील” या अपेक्षेने आलेल्या नागरिकांना बंद दालनेच दिसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.नागरिकांमधून आता मागणी पुढे येत आहे की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचे ‘कान टोचले’ पाहिजेत. पद हे केवळ प्रतिष्ठेसाठी नसून जबाबदारीसाठी असते, याची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.दरम्यान, “दालनांना कुलूप आणि जनतेला प्रतीक्षा” अशी स्थिती कायम राहिल्यास सत्ताधाऱ्यांबद्दलचा विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पक्ष नेतृत्व यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786







